रत्नागिरी : ‘माणसाला मिळालेल्या पाच ज्ञानेंद्रियांचा उपयोग चांगल्या कामासाठी केला पाहिजे. शाळेतून घरी गेल्यावर मोबाइल दे, टीव्हीचा रिमोट दे, अशी मागणी मुले करतात. मोबाइलवर गेम खेळायला दे, असे सांगतात; पण असे करायचे नाही,’ असा संदेश देणारे संवादात्मक कीर्तन करून कीर्तनकार किरण जोशी यांनी दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना बोलते केले.
या विद्यालयातील शारदोत्सवाला किरण जोशी यांच्या कीर्तनाने सोमवारपासून (३० सप्टेंबर) प्रारंभ झाला. या वेळी मुख्याध्यापक विनोद नारकर आणि सहशिक्षक उपस्थित होते. सौ. शिवलकर यांनी सूत्रसंचालन केले. कीर्तनामध्ये श्री. आरेकर यांनी कीर्तनकार जोशी यांचा सत्कार केला. वेदान्त जोशी याने तबला, शंतनू सावंत याने हार्मोनियम आणि विघ्नेश जोशी याने तालवाद्यसाथ केली.
कीर्तनकार किरण जोशी यांनी समर्थ रामदासांच्या मनाच्या श्लोकांचा संदर्भ देऊन मुलांनी कसे वागावे, याची शिकवण पूर्वरंगामध्ये दिली. रामायण, महाभारतासह छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद आदींच्या चरित्रातील संदर्भ त्यांनी दिले. क्रांतिकारकांच्या जीवनातील दाखलेही त्यांनी दिले. ‘मुलांनी आई-वडिलांचे ऐकले पाहिजे. राष्ट्रकार्यासाठी योगदान दिले पाहिजे,’ असा उपदेश त्यांनी केला.
दर वर्षीप्रमाणे शारदोत्सवामध्ये भरत इदाते, सौ. बापट, मंजिरी लिमये, संदीप कांबळे व अंजली लिमये हे मान्यवर कथाकथन सादर करणार आहेत. तसेच बालसभेचे आयोजनही करण्यात आले आहे.